Friday, February 4, 2011

शिवसेनेची "युवा' ताकद रोखण्यात "मनसे' अपयशी

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांची विद्यार्थी सेना मुंबई विद्यापीठात काम करू लागली असली, तरी त्यामुळे शिवसेनेच्या युवा सेनेला कोणताही धक्का लागू शकत नाही, हे सिनेटच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले. जेथे राज ठाकरे यांचा चेहरा प्रत्यक्ष मैदानात दिसतो, त्याच ठिकाणी मनसे यश मिळवू शकते. संघटना म्हणून शिवसेनेला आव्हान देण्याची क्षमता नव्या सेनेत निर्माण झालेली नाही, हे नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांत दिसून आले आहे.

सिनेटची निवडणूक म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील सुशिक्षितांची निवडणूक. प्राधान्यक्रमाने या निवडणुकीसाठी मतदान होते. यापूर्वी राजकीय पक्ष आपापल्या विद्यार्थी संघटनांद्वारा ही निवडणूक लढवत असत. अनेकदा तर ती बिनविरोधही होई. पण, उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीतेश यांनी "स्वाभिमान' संघटनेच्या माध्यमातून मुंबईत आपले बस्तान बसविण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुंबईतील सर्वच निवडणुका चुरशीच्या झाल्या आहेत. पक्षभेदापेक्षा कुटुंबभेद महत्त्वाचे आणि परस्परांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा त्यातून दिसून येत असते. या वेळच्या सिनेट निवडणुकीलाही हे सारे नियम लागू होते. एका बाजूला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आपले पुत्र आदित्य यांच्या यशस्वी राजकारण पदार्पणाची काळजी आणि दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्याची "मनविसे'ची धडपड, यातून ही निवडणूक जास्त महत्त्वाची आणि रंगतदार झाली.
घराण्यातील इर्ष्येमुळे मुंबईतील निवडणुका शिवसेना व मनसे यांना आणि उद्धवद्वेषामुळे राणे यांना जेवढ्या महत्त्वाच्या वाटतात, तेवढ्या इतरांना वाटत नाहीत. कॉंग्रेसचे अमरजितसिंग मनहास हे आतापर्यंत सिनेट निवडणुकीतले "दादा' मानले जात होते; पण, आता "म्हाडा'चा आसरा लाभल्याने सिनेटमध्ये कशाला लक्ष घालायचे, या न्यायाने त्यांनी निवडणुकीकडे पूर्ण दुर्लक्ष केले. समीर देसाई हेही निवडणुकीपासून दूरच होते. भारतीय जनता पक्षाचे विनोद तावडे, पराग अळवणी हे नेतेही "पक्षाचे' झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निवडणुकीत लक्ष घालायला कोणी राहिले नव्हते. त्यामुळे शिवसेनेने केलेली मतदारनोंदणी निवडणुकीच्या निकालासाठी निर्णायक ठरणार, हे उघड होते. बावीस हजार मतदार शिवसेनेने नोंदविले. त्यांपैकी सुमारे 50 टक्के मतदारांनी मतदान केले. त्याचा फायदा शिवसेनेला झाला. दहापैकी आठ जागा त्यांनी अगदी सहज जिंकल्या.

युवा सेनेला टक्कर देण्यासाठी "मनविसे', "स्वाभिमान' आणि कॉंग्रेसप्रणीत "बॉंबे ग्रॅज्युएट फोरम' एकत्र आले होते. "स्वाभिमान'चा नऊ हजार मतदार नोंदणीचा दावा होता. "मनविसे'ने साडेसहा; तर "बॉंबे ग्रॅज्युएट'ने 11 हजार मतदार नोंदविल्याचा दावा केला होता; पण प्रत्यक्षात या संघटनांकडून तेवढी नोंदणी झाली नसावी किंवा केलेल्या मतदार नोंदणीपैकी किमान निम्मे मतदान प्रत्यक्ष घडविण्यात त्यांना यश आले नसावे. शिवसेनेला त्यांच्या स्थानिक लोकाधिकार समितीने नेहमीप्रमाणे निर्णायक मदत केली. याउलट, पूर्वी भारतीय विद्यार्थी सेनेकडून सिनेटवर असलेल्या राजन शिरोडकर आणि अतुल सरपोतदार यांचा "मनविसे'ला अपेक्षित उपयोग झाला नाही. त्यांनी आपल्या अनुभवाच्या बळावर केलेली व्यूहरचना पक्षाला तारू शकली नाही

No comments:

Post a Comment