Friday, February 4, 2011

नरेंद्र मोदींचे उद्योजकांना 'पधारो म्हारो प्रदेश'

ख्खा महाराष्ट्र मंत्रिमंडळाची प्रतीक्षा करीत असतानाच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गुंतवणूकदारांना भेटून गेले. "व्हायब्रंट गुजरात'चा जल्लोष उद्योगजगतावर गेली काही वर्षे गारूड घालतो आहे. त्यातच आता मोदींनी राज्याराज्यांत जाऊन भांडवल खेचण्यासाठी "रोड शो' करण्याचा घाट घातला आहे. मोदींची प्रतिमा प्रत्यक्षाहून उत्कट करण्याची कामगिरी त्यांनी नेमलेल्या "पीआर' कंपन्या चोखपणे बजावतात. आधुनिक भारताच्या उभारणीसाठी सज्ज झालेला हिंदुप्रेषित असा मोदींचा ब्रॅंड अचूक उभा केला जातो. गेल्या दहा वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या या प्रचाराला वास्तवाची जोड मोदींच्या कृतींमधून समोर येते.

"आदर्श' गैरव्यवहाराची लक्‍तरे वेशीवर टांगली असताना मोदींनी मुंबईत काही तासांचा दौरा केला. त्यांनी पत्रकारांना सांगावा धाडला असता, तर सारे लेखणी-कॅमेरे घेऊन धावत आले असते. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ तयार करण्यास लागणाऱ्या विलंबावर मोदींनी केलेल्या सुरस टिप्पण्यांच्या बातम्या पहिल्या पानावर झळकल्या असत्या. मात्र मोदी केवळ राजकीय नेते नाहीत. ते तल्लख राजकीय व्यवस्थापक आहेत. महाराष्ट्राची कुठलीही उणीदुणी न काढता येथील गुंतवणूकदारांना गुजरातेत येण्याचे आमंत्रण त्यांनी दिले. गुजरातमधील सोयी-सुविधांची अद्‌भुत माहिती ओघवत्या शैलीत ते उद्योजकांसमोर सादर करतात. मुस्लिमांच्या शिरकाणाला राजकीय आशीर्वाद देणाऱ्या मोदींवर टीका करण्याची एकही संधी कॉंग्रेसचा छोटा-मोठा नेता सोडत नसतो. समाजात द्वेष पसरविण्याच्या कृतीवर कोरडे ओढले जायला हवेतच; पण मोदी त्याहून पलीकडे जाऊन काय करू बघताहेत, ते तपासून पावले उचलणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. वीजटंचाईचा गेली कित्येक वर्षे सामना करणारे महाराष्ट्र हे आजही गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे; पण लवकरच आपण गुजरातच्या प्रयत्नांमुळे क्रमांक दोनवर जाण्याची भीती या क्षेत्रातले जाणकार व्यक्‍त करतात. महाराष्ट्रातील सनदी अधिकारी सांगत असलेल्या कहाण्या थक्‍क करणाऱ्या आहेत. गुजरातमधील एका अधिकाऱ्याने, "महाराष्ट्राने सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवित केलेल्या रतन टाटांच्या कौशल्याचा लाभ आम्ही कसा घेतो आहोत, ते पाहा,' असे सांगून खिजवल्याची खंतही उद्योग खात्याचे अधिकारी पूर्वी व्यक्‍त करीत. कोणत्याही राज्यातून येणारा छोटासासुद्धा प्रस्ताव गुजरातेत प्राधान्यक्रमाने तपासला जातो. पैसा गुंतवू बघणाऱ्या छोट्या उद्योजकांशीही मोदी स्वत: तातडीने संपर्क साधतात. मुंबईतील गुजरात परिषदही याच प्रयत्ना
ंचे प्रतीक होती. चीनमध्ये नुकत्याच झालेल्या उद्योग परिषदेला गेलेल्या खाशा स्वाऱ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. हॉटेल ताजमध्ये झालेल्या या परिषदेत गुजरात सेल करण्यासाठी झालेला प्रयत्न कमालीचा चांगला होता, अशी चर्चा आहे. मोदींच्या या मोहिमांकडून आपण काय शिकतो, हा महत्त्वाचा प्रश्‍न. मुख्यमंत्री म्हणून ब्रॅंड विकसित करण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत. भूसंपादनाबद्दलचे वाद, विजेची कमतरता व राजकीय इच्छाशक्‍तीच्या अभावामुळे महाराष्ट्र गुजरातच्या स्पर्धेत मागे पडण्याची भीती वेळोवेळी व्यक्‍त केली जाते. पृथ्वीराज चव्हाण-अजित पवारांच्या नेतृत्वाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मोशीतील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरला मंजुरी हा या दोघांनी घेतलेला पहिला अभिनंदनीय निर्णय. गुजरातपुढे टिकून राहण्यासाठी असेच निर्णय धडाक्‍याने घ्यावे लागतील. "पधारो म्हारे प्रदेश' म्हणत मोदी लाल गालिचे अंथरताहेत. अशा वेळी महाराष्ट्रातील नवे कारभारी काय करतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरते आहे...

No comments:

Post a Comment