Friday, February 4, 2011

महाराष्ट्रातील नेतृत्वबदल अन्‌ माध्यमांची अपरिपक्वता!

महाराष्ट्राच्या राज्य कारभाराच्या किल्ल्या नव्या कारभाऱ्यांच्या हाती सुपूर्द झाल्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा मुंबईहून दिल्लीला गेले. मात्र, सत्तेचे केंद्र असलेल्या मुंबईचे लक्ष ओबामा इंडोनेशियाकडे कधी प्रयाण करतात, यासाठी दिल्लीकडे लागले होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही ओबामांची पाठ फिरल्या फिरल्या अशोक चव्हाण यांच्याकडील किल्ल्या काढून घेतल्या. चव्हाण जात आहेत याचे निमित्त करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही बदलाची मागणी सुरू झाली. त्यातून उपमुख्यमंत्रिपदावरून छगन भुजबळ यांनाही जावे लागले. या सगळ्या राजकीय नाट्यामध्ये अंदाजांना आणि भाकितांना भरपूर वाव होता. प्रसिद्धिमाध्यमांनी त्याचा पुरेपूर लाभ घेत आपली (अ)परिपक्वता वाचक-दर्शकांसमोर ठेवली.

कोणत्याही निवडीच्या वेळी अंदाज बांधताना तर्कांचा आधार घ्यावा लागतो. निर्णय घेणारा नेमके कोणते गणित मांडतोय, कोणत्या तर्काधारे विचार करतो, हे शंभर टक्के ताडणे अवघडच असते. निर्णय घेणाऱ्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्यासमोर असलेले पर्याय, परिस्थितीची अपरिहार्यता आणि नाइलाज, तसेच निर्माण होणाऱ्या शक्‍यता यांचा विचार करून प्रसिद्धिमाध्यमांत काम करणाऱ्यांना अशा वेळी अंदाज बांधावे लागतात. या सगळ्या पायऱ्या पार करताना सोबत अनुभवाची आणि नेमक्‍या निरीक्षणाची जोड असावी लागते. यातल्या कुठल्याच गोष्टीचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग केला नाही, तर केवळ "मनात आले, ते नाव ठोकून दिले' या न्यायाने अंदाज बांधले जातात. असे अंदाज नेहमीच फसतात, हास्यास्पद ठरतात. मुंबईत असलेल्या प्रसिद्धिमाध्यमांनी गेला आठवडाभर उभ्या महाराष्ट्राची आणि देशाचीही भरपूर करमणूक केली.
विद्यमान मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले आणि ज्या प्रकरणाची "सीबीआय' चौकशी सुरू होते आहे, त्या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध आलेल्यांना संधी मिळणार नाही, हे उघड होते. अशा कुणाला संधी द्यायची तर विद्यमान मुख्यमंत्र्यांना का हटवायचे, या प्रश्‍नाचे उत्तर श्रेष्ठींना द्यावे लागले असते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री स्पर्धेतून आपोआपच बाजूला पडले. संभाव्य नावांमध्ये माजी परिवहनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी विधिमंडळ कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची नावेही प्रसिद्धिमाध्यमांनी चर्चेत आणली होती. विखेंबाबत तर पिता-पुत्रांचे नाव एकाच वेळी सांगितले जात होते. नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनीताई यांना आणण्यासाठी विखे पिता-पुत्रांनी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केल्याने पक्षाने त्यांना वारंवार कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, हे प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या गावीही नव्हते! शेवटी खुद्द बाळासाहेबांनीच या प्रतिनिधींना "गेली पन्नास वर्षे माझं नाव चर्चेत आहे', असे सांगून फटकारले!
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी येण्यासाठी अजितदादांच्या समर्थकांनी बैठका घेतल्या, जेवणावळी केल्या. खुद्द भुजबळ यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत याचा खरपूस समाचार घेतला. "राष्ट्रवादी'च्या विधिमंडळ नेतेपदी निवड होण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पुतण्याला पक्षात अशा प्रकारचे वातावरण तयार करावे लागते, पवार यांना आपल्या मनाविरुद्ध निर्णय करावा लागतो, असे सांगत पवार यांच्या पारंपरिक विरोधी प्रसिद्धिमाध्यमांनी दोन दिवसांत बरीच टीका केली. या टीकेमुळे त्यांनी शरद पवार यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्याची संधी गमावली, हे त्यांच्याही लक्षात आलेले दिसत नाही!!

No comments:

Post a Comment