Friday, February 4, 2011

ढिम्म रेल्वे प्रशासनामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर

जनतेचे प्रश्‍न समजावून घेण्यासाठी आणि सोडविण्यासाठी लोकशाही ही सर्वांत चांगली राजकीय पद्धती आहे, असे म्हटले जाते. पण, भारतात मात्र तसे म्हणावे अशी स्थिती नाही. मुंबईत तर नाहीच नाही. "लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींसाठी लोकप्रतिनिधींमार्फत त्यांच्या हितसंबंधांसाठी चालविलेले राज्य', असे इथल्या लोकशाहीचे वर्णन करावे लागेल. अन्यथा, नको त्या कामांवर लाखो रुपयांची उधळपट्टी होत असताना जनतेच्या जीवनमरणाचे प्रश्‍न वर्षानुवर्षे खितपत पडले नसते. गेल्या रविवारी विक्रोळीमध्ये रेल्वे प्रशासनाविरुद्ध प्रवाशांचा झालेला उद्रेक आणि त्यातून पाच तास खोळंबून राहिलेली मध्य रेल्वेची सेवा हा याचाच परिणाम होता. पूर्व आणि पश्‍चिम भागातील जनतेला रेल्वेरूळ ओलांडून जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्याचा साधा प्रश्‍न; पण गेली कित्येक वर्षे तो तसाच आहे. गेल्या रविवारी पहाटेपासून झालेल्या अपघातमालिकेत तीन जण दगावले आणि एक जण गंभीररीत्या जखमी झाला, तेव्हा प्रवाशांना आपला संताप आवरता आला नाही. रेल्वे वाहतूक पाच तास खोळंबून ठेवल्यानंतर रेल्वे प्रशासन जागे झाले. आश्‍वासनांच्या पुड्या सुटल्या आणि वाहतूक सुरळीत केली गेली. आता विक्रोळी रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार, काही कामे तातडीने सुरू करण्यात आली आहेत. ती पूर्ण होतील की नाही, हे आता सांगणे कठीण आहे. पण, "काट्याचा नायटा' होईपर्यंत कोणत्याही प्रश्‍नाकडे बघायचे नाही, ही खास "बाबूवृत्ती' त्यातून दिसून आली. मुंबई उपनगर रेल्वेसेवा ही देशातील सर्वाधिक फायद्याची रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे रोज जेवढ्या प्रवाशांची वाहतूक करते, त्यापैकी निम्मे प्रवासी रोज या उपनगर सेवेतून प्रवास करतात. साधारण 6.9 दशलक्ष प्रवासी रोज मुंबईत रेल्वेने प्रवास करतात, अशी दोन वर्षांपूर्वीची आकडेवारी आहे. नऊ डब्यांची एक र
ेल्वेगाडी एक हजार 700 प्रवासी क्षमतेची असते. मात्र, मुंबईत गर्दीच्या वेळी याच नऊ डब्यांतून साडेचार हजार प्रवासी प्रवास करतात. रेल्वेच्या डब्यात एका चौरस मीटरमध्ये 14 ते 16 जण उभे असतात. जगातील रेल्वे वाहतूक सेवेतील गर्दीचा हा उच्चांक आहे, असे म्हटले जाते. प्रवासी क्षमतेपेक्षा ही जादा वाहतूक गेल्या दोन-पाच वर्षांत होते आहे, असे नाही. गेली कित्येक दशके हीच स्थिती असूनही रेल्वे प्रशासनाला तिच्या क्षमताविकासाचा आराखडा तयार करून त्यात सुधारणा करावी, असे वाटले नाही. त्यामुळे आता या सुविधेवरील बोजा एवढा वाढला आहे, की त्यामुळे अशा उद्रेकांना निमंत्रण देण्याशिवाय या सेवेकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.

लोहमार्गावरील पूर्व-पश्‍चिम वाहतुकीसाठी असलेली रेल्वेफाटके टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय वीस वर्षांपूर्वी झाला; पण अद्यापपर्यंत सर्वच्या सर्व फाटके बंद झालेली नाहीत. या फाटकांच्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून आवश्‍यकतेनुसार पादचारी पूल किंवा उड्डाणपूल बांधण्याची गरज असताना संबंधित सर्व उदासीन यंत्रणा त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलून सुस्त आहेत. अशा वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा पालकमंत्र्यांनी लक्ष घालून सर्व यंत्रणांना एकत्रित आणणे गरजेचे असते. पण लोकप्रतिनिधींनाही त्याची फिकीर नसल्याने ही रेल्वेफाटके ओलांडताना कित्येक जण रोज मृत्युमुखी पडतात. रोज दहा जणांना रेल्वेच्या असुविधा आणि बेफिकिरीमुळे जीव गमवावा लागतो. जीव धोक्‍यात घालूनही जे वाचतात, तेच अखेरीस घरी जातात, अशी मुंबईच्या रेल्वेसेवेची अवस्था झाली आहे.

No comments:

Post a Comment